न्यूयार्क – “फणी’ चक्रीवादळासंदर्भात अगदी तंतोतंत बरोबर अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा संयुक्त राष्ट्राने गौरव केला आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत आणि बरोबर वर्तवल्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
फणी चक्रीवादळाचा अगदी अचूक अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. चक्रीवादळ जमिनीवर नेमके कुठे धडकणार, किती वाजता धडकणार, त्याची तीव्रता काय असणार, दिशा काय असणार याचा अगदी बरोबर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सुमारे 10 लाख लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रेल्वे आणि विमान सेवांनी या अंदाजानुसार आपल्या वेळापत्रकात बदल केले आणि ठरावीक वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे प्रवासी अडकून पडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत आणि मोठे अपघातही वाचले.
गेल्या 20 वर्षांतले सर्वात मोठे चक्रीवादळ 3 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्याला धडकले. पुरीपासून जवळच या वादळाचा केंद्रबिंदू होता. पुरी हे देशी – विदेशी पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे. पुरीमध्ये होणारे नुकसान आधीच वर्तवले गेल्यामुळे पर्यटकांना इथून वेळीच बाहेर काढण्यात आले आणि मोठी जीवितहानी टळली. पर्यटकांना होणारा मनस्तापही खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला, असे राष्ट्रसंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.