पिंपरी – ‘करोना’चे वाढते रुग्ण व मृतांचा आकडा पाहता, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 नागरिकांना उपस्थितीची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र सध्या नैसर्गिक कारणानेदेखील मृत्यू होणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला नातेवाईक फिरकेनासे झाले आहेत. त्यात भर म्हणजे गावकी- भावकीतील एखाद्याचे निधन झाल्यास, सोशल मीडियावर पाठविण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला नसल्याची अतिरिक्त माहिती दिली जात आहे. अशाप्रकारे निधन वृत्ताच्या मेसेजमध्येदेखील करोनाने शिरकाव केला आहे.
जागतिक पातळीवर करोनाची दाहकता समोर आल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने मार्च महिन्यात करोनाला जागतिक महामारी घोषित केले. त्यानंतर मार्च महिन्यात भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. आता या घटनेला जवळपास चार महिने पूर्ण होत आले आहेत. या कालावधीत करोनाचे रौद्र रुप समोर आले आहे. सुरुवातीला केवळ महानगरे व शहरांपुरता मर्यादित असलेल्या करोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्याने ग्रामीण भागातही आरोग्यविषयीचे गांभीर्य वाढले. अगदी खेडोपाडीदेखील करोनाचे रुग्ण सापडू लागले. त्यातच अनेकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आल्याने एकमेकांकडे संशयाने पाहिले जाऊ लागले.
संशयी नजरा रोखण्याचा प्रयत्न
शहर, निमशहरी भागाबरोबरच खेड्यातील करोबाबाधितांच्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोणत्याही नागरिकाचा मृत्यू हा करोनामुळेच झाला असावा, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. त्यामुळे मृताच्या कुटुंबातील सदस्यांकडेदेखील संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. ही संशयी नजर रोखण्यासाठी आता मृताच्या नातेवाईकांनी निधनाच्या मेसेजमध्ये करोनामुळे मृत्यू झाला नसल्याचा आवर्जून उल्लेख करत आहेत.
तरुण, मध्यमवयीन मयतांबाबत अधिक संशय
करोनामुळे जाहिर केलेल्या लॉकडाउनमुळे संचारबंदी लागु करण्यात आली आहे. परिणामी दैनंदिन घडामोडी समजण्यास अडथळे येत आहेत. तर परिसरातील घडामोडी, नातेवाईक, सगे-सोयरे व परिचितांची ख्याली -खुशाली समजण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. तर तरुण व मध्यमवयीन नागरिकांच्या मृत्युकडे तुलनेत संशयाने पाहण्याचे प्रमाण अधिक आहे.