नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे नसताना भारतीय हद्दी शेजारी चीनी विमाने आणि हेलिकॉप्टरनी घिरट्या घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शांततापूर्ण तडजोडीचे भारताचे संवादाचे प्रयत्न सुरू असताना या प्रक्षोभक कृतीला चोख उत्तर देण्याचे भारताने ठरवले आहे. त्यामुळे जवानांना खांद्यावरून मारा करता येणारी हवाई संरक्षण मिसाईल्स उंचीच्या ठिकाणांवरील जवानांकडे सोपवण्यात आली आहेत.
रशीयन बनावटीच्या लग्ला मिसाईल्स महत्वाच्या उंच ठिकाणांवरील तैनात जवानांकडे सोपवण्यात आली आहेत. त्यांना शत्रू राष्ट्राच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्यास त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.
रशियन बनावटीची हवाई संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कर आणि हवाई दलही वापरत आहे. त्याचा वापर संरक्षण तळाच्या जवळपास शत्रू राष्ट्राची विमाने आल्यास केला जाण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर सीमेवरील टेहळणी वाढवण्यासाठी भारत चीन सीमेवर रडार यंत्रणा आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल्स तैनात करून वाढवण्यात आली आहे.
गलवान खोरे आणि गस्ती नाका क्र. 14 जवळ चीनी हेलीकॉप्टर भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे भारतीय लष्कराच्या निदर्शनास आले आहे. भारतीय हवाई दलाने तेथे चीनी हेलीकॉप्टर्सची घुसखोरी रोखण्यासाठी लढाऊ विमाने मे महिन्यापसून तैनात ठेवली आहेत.
होतान, गर गुन्सा, काशघर, हॉपिंग, डीकोन्जा डीझोमग, लिनशीही आणि पनगट भागातील चीनच्या हवाई तळावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शिनजिआंग आणि तिबेट भागातील हवाई दलाचे हे तळ अलीकडच्या काळात भलतेच सक्रीय झाले आहेत.