पुणे : आजपर्यंत वाहतूक नियोजन, रस्त्यांची कामे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, स्वच्छतेचे उपक्रम आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली असून, हीच विकासाची गती पुढील काळातही कायम ठेवली जाईल. प्रभाग अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सर्वसमावेशक आराखड्याअंतर्गत काम केले जाईल, असे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार फेरीदरम्यान सुगत (श्रीशैल) चंद्रशा दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेतल्या जात असून, त्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असा विश्वासही उमेदवारांनी व्यक्त केला. स्वच्छता, पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित सोयीसुविधांचे बळकटीकरण हेच आपल्या कार्याचे मुख्य ध्येय असल्याचे सांगत, भविष्यातही यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी मतदारांसमोर मांडला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.