वाघोली : वाघोलीमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे कडक शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोरोना वाघोली गावपातळीवरील सनियंत्रण समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. वाघोलीची मोठी लोकसंख्या व कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाच्या मदतीने विशेष जनता कर्फ्यू लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जनता कर्फ्यूची परवानगी मिळाल्यानंतर काय उपाययोजना कराव्यात याबाबत चर्चा करण्यात आली.
सायंकाळी ५ नंतर दुकाने चालू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविणे, वाघोलीतून कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नोंदणी करणे, शासकीय नियमांची अंमलबजावणी करणे आदींबाबत कडक अंमलबजावणी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाच्या मदतीने करण्याचे ठरविण्यात आले.
यापूर्वीच नेमलेली ग्रामपंचायतीची वार्डस्तरीय समिती व ग्रामस्थांच्या मदतीने नियमांच्या अंमलबजावणी बाबत नियंत्रण ठेवण्यात येईल. भाजीपाला विक्रेते सर्वाधिक सोशल डीस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने या विक्रेत्यांना बाजारतळ मैदानामध्ये सुरक्षित अंतर राखून जागा देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
अवैध धंदे आणि पानटपऱ्यांवर कारवाईची मागणी
कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी वाघोली परिसरातील अवैध धंदे कारणीभूत ठरू नये यासाठी अवैध धंद्यांवर कारवाई करावी तसेच कोरोना वाढण्यासाठी पानटपरी चालकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरू शकत असल्याचा मुद्दा समोर आला. काही पानटपरी चालक अवैध दारूची विक्री करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी करून त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.
कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नोंदणी होणे गरजेचे
वाघोली गावातून कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांची नोंदणी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत फक्त १५० जणांनीच नोंदणी केली आहे. वाघोलीतून जवळपास चार ते पाच हजार नागरिक कामानिमित्त बाहेर जात असतानाही १५० जणांनीच नोंदणी केल्याने नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांसाठी खाटा कमी पडू लागल्या
वाघोली व परिसरातील लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहेत. परंतु याठिकाणी खाटा कमी पडू लागल्या आहेत. वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता पुढील काळात वाघोलीतील खाजगी हॉस्पिटलच्या काही खाटांच्या जागा आरोग्य विभाग ताब्यात घेऊ शकते.