- वेगवेगळी कारणे शोधून नागरिक घराबाहेर
- दिघीतील अंतर्गत रस्ते बंद करून शोधला उपाय
चऱ्होली – पोलीस प्रशासनाने घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना देऊनही व राज्यात संचारबंदी कायदा लागू असताना सुद्धा दिघी परिसरात कायद्याची पायमल्ली करणाऱ्या मुजोर नागरिकांची रस्त्यावर कायमच वर्दळ दिसून येते. अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या वेळेत काहीतरी कारणे शोधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे “सोशल डिस्टसिंग’चा दिघीत फज्जा उडाला असल्याचे वास्तव आहे. यामुळे नागरिकांच्या बाहेर पडण्याला अटकाव करण्यासाठी परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्याची शक्कल लढविली आहे.
भोसरी-आळंदी रस्त्यावर वाळके मळ्याजवळ पोलीस प्रशासनाने “चेक पोस्ट’ उभारली आहे. ओळखपत्र असल्याशिवाय वाहनांना सोडल्या जात नाहीच. शिवाय विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना माघारी पाठविण्यात येते. त्यामुळे काही उपद्रवी नागरिकांनी दिघी रस्त्यावरून थेट दिघीमार्गे रस्त्याचा वापर सुरू केला. परिणामी दिघीमधून आळंदी, विश्रांतवाडी, भोसरी जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. यामध्ये चारचाकी वाहनाचा भरणा अधिक होता. वाहनांवर व नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून सुद्धा नागरिकांची वर्दळ कमी होत नसल्याचे चित्र आहे.
त्या पार्श्वभूमीवर करोनाच्या वाढत्या प्रभावात दक्षता घेत करोनाला रोखण्यासाठी दिघीकारांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील सह्याद्री कॉलनी, आदर्शनगर, सावंतनगर, चौधरी पार्क, कृष्णा कॉलनी, परांडेनगर, काटे वस्ती, विजयनगर, दिघी गावठाण, दत्तनगर, डोळस वस्ती, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर अशा मुख्य व अंतर्गत रस्ते मातीचा भराव टाकून तर कुठे सिमेंटचे मोठे पाईप आडवे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.नागरिकांनी कुठल्याही अफवा न पसरवता अफवांवर विश्वास ठेवू नये. घराबाहेर न पाडण्याचे आवाहन दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी केले आहे.
दिघीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते बंद करण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या वतीने नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेविका हिराबाई घुले, कुलदीप परांडे, चेतन घुले व दिघीतील ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.