कात्रज, दि. 20 – भारत देश आज प्रगती आणि विकासाची फळे चाखतो आहे, त्याची पायाभरणी केंद्रातील राजीव गांधी सरकारच्या काळात झाली. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
भारतरत्न पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त, कात्रज प्राणिसंग्रहालय येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख व कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले. पुष्पांजली अर्पण व अभिवादन कार्यक्रमास शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, आबा बागुल, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे आदि नेते उपस्थित होते. स्मारक समिती सदस्य भोला वांजळे, सुभाष थोरवे, आबा जगताप, संजय अभंग, लहुआण्णा निवंगुणे, महेश अंबिके, घनःश्याम निम्हण आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. स्मारक समितीचे बाळासाहेब मारणे यांनी आभार मानले.