प्रभात वृत्तसेवा मंचर – कळंब (ता.आंबेगाव) येथील शिरामळा वस्तीवरील शेतकरी वरूण पिंगळे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पंधरा दिवसानंतर पुन्हा दुसऱ्यांदा शुक्रवार, दि.२१ रोजी पहाटे बिबट्या घरासमोर आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.परंतु सुदैवाने कुत्र्याने तेथून पळ काढल्याने कुत्रा वाचला. शिरामळा येथील वस्तीवर सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला असून वस्तीवरील कुत्री,मांजरी यांचा फडशा पाडला आहे. शेतात काम करणे व रात्री अप रात्री घरी पायी व दुचाकीवर जाणे रस्त्याने भीतीदायक झाले आहे. तरी शिरामळा वस्तीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा.अशी मागणी माजी उपसरपंच डॉ.सचिन भालेराव यांनी केली आहे.तसेच बुधवार दि.१९ रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान कळंब गावठाणातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ रहिवासी महिला शेकोटी पेटवून शेकत असताना कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले असता बिबट्या जवळच दोनशे फुटाच्या अंतरावर असल्याचे दिसून आले. महिलांनी आरडाओरडा करताच तेथून त्याने पळ काढला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने मोठी घटना होण्याची टळली. तेथे असणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्या तेथूनच मागे असणाऱ्या शेतात पळून गेला, असे उद्योजक संदीप उर्फ पप्पू भालेराव यांनी सांगितले. भय इथले संपत नाही… गावठाणातील भर नागरी वस्तीत बिबट्या भक्ष शोधण्यासाठी मोकाट कुत्र्यांच्या शोधात येऊ लागल्यामुळे नागरिकांना भरवस्तीत राहणे सुद्धा मुश्किल झाले आहे. गावठाणात बिबट्याच्या भीतीने मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांना शोधण्यासाठी बिबटे गावातही येऊ लागल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा कधी हल्ला होऊ होईल, सांगता येत नाही. थोडक्यात भय इथले संपत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तरी शासनाने या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.अशी मागणी सर्वच ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.