भारत व अमेरिकेतील फेसबुक कार्यालयात देखरेखीसाठी वॉर रूम सक्रिय
मेनलो पार्क – अमेरिकेबाहेर भारतात फेसबुक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. भारतामध्ये कोट्यवधी लोक फेसबुकचा वापर करतात. आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकात जवळजवळ 90 कोटी मतदार मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात निवडणूक विषयक अपप्रचार रोखण्यासाठी फेसबुकने आपल्या मुख्यालयात आणि भारतातील कार्यालयात मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.
ही माहिती फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही भारतात आणि अमेरिकेतील मुख्यालयात ही याबाबत वार रूम तयार केली आहे. खोटी माहिती पसरवणे खोटी खाती तयार करून त्या आधारावर खोटी माहिती पसरविणे यासारखी अनेक कृत्ये केली जातात.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर इतर सात कंपन्यांची आम्ही याबाबत सहकार्य केले आहे. भारतात इंग्रजी, हिंदी, बंगाली, मराठी, तेलगु, तमिळ, मल्याळम आणि गुजराती या भाषांतूनही फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
या भाषातून होणाऱ्या माहितीच्या प्रसारणाडेही फेसबुकचे बारीक लक्ष आहे. अपप्रचार करणारी खाती रद्द करण्याची जोरदार मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या संबंधात फेसबुकने अठरा महिन्यांपूर्वीच काम सुरू केलेले आहे. राजकीय पक्षांनी किंवा लोकांनी फेसबुकचा निवडणुकीवेळी दुरुपयोग करू नये अशा सूचना केंद्र सरकारने फेसबुकला अगोदरच दिलेल्या आहेत.
गेल्याच आठवड्यात फेसबुकने विविध राजकीय पक्षाची बरीच पाने रद्द केली आहेत. त्याचबरोबर फेसबुकवर प्रसारित होणाऱ्या माहितीची शहानिशा करणारी काही यंत्रणा उपलब्ध केलीा आहे. यावर सध्या जवळजवळ 40 गट काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात 23 मे पर्यंत निवडणुकात होणार आहेत. त्या काळात अतिशय सावध राहून अपप्रचार रोखण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.