प्रभात वृत्तसेवा शिरूर – तालुक्यातील बेट भागात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहिता लागू होण्यास अद्याप अवधी असला तरी, इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचारापूर्वीच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सध्या या भागात होम मिनिस्टर, देवदर्शन, भव्य जागरण-गोंधळ आणि सामूहिक जेवनावळींची जंत्री सुरू असून, त्या आडून राजकीय गणिते जुळवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.टाकळी हाजी जिल्हा परिषद गट सध्या खुल्या प्रवर्गासाठी असल्याने या ठिकाणी गटाबाहेरील आणि शेजारील आंबेगाव तालुक्यातील उमेदवारांनीही चाचपणी सुरू केली आहे. काही इच्छुकांनी आता नाही तर कधीच नाही, असा पवित्रा घेत गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क वाढवला आहे. दुसरीकडे घराणेशाहीला शह देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकां समोर पेच निर्माण झाला असला तरी, त्यांचा वैयक्तिक प्रचार मात्र जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ऐनवेळी पक्षांतराचा पर्याय देखील काहींनी खुला ठेवल्याचे खाजगीत सांगितले जात आहे.तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकतेच कवठे येमाई येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संयुक्तपणे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महिलांची झालेली मोठी गर्दी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. याच पावलावर पाऊल टाकत आता दुसऱ्या एका इच्छुकाने टाकळी हाजी येथे शुक्रवारी (दि. २ जानेवारी) भव्य जागरण-गोंधळ आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करून शक्ती दाखवण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. आचारसंहीतेला बगल देत नियोजन प्रशासकीय निर्बंध येण्यापूर्वीच हे सर्व कार्यक्रम जाणीवपूर्वक आखले जात असून, त्याद्वारे मतदारांना प्रलोभने दिली जात असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमांना जमणारी गर्दी आणि तिथे उपस्थित राहणारे राजकीय नेते यांच्यावरून आगामी निवडणुकीची दिशा ठरणार आहे. अनेकांचा नशीब आजमावण्याची धडपड पंचायत समिती गटामध्येही अनेक नवीन चेहरे आपले नशीब आजमावण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या अनोख्या शक्तिप्रदर्शनाच्या लढाईत मतदार कोणाला कौल देतात आणि कोणाचा राजकीय गोंधळ उडतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.