उरुळी कांचन -उरुळी कांचन ते जेजुरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. प्रवासी, नागरिक, भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर अनेकजण जायबंदी झाले असताना संबंधित प्रशासनातील अधिकारी गांधारीची भूमिका घेत आहे. राज्यमंत्र्यांच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डयांतून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व भाविकांनी दिला आहे.
सोलापूर महामार्गावरील उरुळी येथील तळवाडी चौकातून रस्ता जेजुरीला जातो. मोरगाव, थेऊर, जेजुरी, नारायणपूरकडे ये- जा करणाऱ्या भाविकांची वर्दळ आहे. उरुळी ते शिंदवणे घाटापर्यत खड्डे आहेत. उरुळी येथे दर रविवारी आठवडे बाजारात शेतीमाल बाजारात पेठेत नेण्यासाठी खड्डयांतून मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, माजी आमदार अशोक पवार म्हणाले की, सध्याचे आमदार फक्त उद्घाटन करीत आहेत. कामे कमी आहेत. कामापेक्षा भूमिपूजनला महत्व देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
शिरुर- हवेली तालुक्यातील सर्व रस्ते अतिशय चांगले होणार आहेत. हवेली तालुक्यातील जुन्या बेबी कालव्यावर आधुनिक पद्धतीचा पूल केला आहे. उरुळी कांचन ते जेजुरी हा मार्ग लवकरच दर्जेदार होईल.
-बाबुराव पाचर्णे, आमदार.