प्रदक्षिणा मार्गाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा : रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची
आळंदी – श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे प्रदक्षिणा मार्गाचे काम हे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 90 टक्के काम पूर्णत्वास गेले आहे मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडत असून “नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने’ असा प्रकार आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाचा झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी शहरासह आळंदीतून बाहेर जाणारे सर्व रस्ते (आळंदी-केळगाव, आळंदी-वडगाव, आळंदी-मरकळ, आळंदी-चऱ्होली खुर्द, आळंदी-पद्मावती, आळंदी-चाकण, आळंदी- मोशी, आळंदी-देहू, आळंदी-वडगाव घेनंद रस्ता) सिमेंटचे झाले; मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आळंदीच्या प्रदक्षिणा मार्गावर नगरपालिका चौकापर्यंत दहा ते बारा चौक असून ठीकठिकाणच्या जोड रस्त्यात वापरण्यात येणारे फेव्हिंग ब्लॉक हे खालीवर आडवेतिडवे असे बसवल्याने प्रत्येक चौकात वाहनचालकांना ते त्रासदायक ठरत असून, यामुळे आजवर अनेकांचे कंबरडे मोडले आहे.
जोरदार दणका बसल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. ही बाब जरी शुल्लक असली तरी नागरिकांच्या वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे यामुळे वाहतूककोंडी होऊन छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.
गेल्या महिन्याभरापासून शहरात उभे करण्यात आलेले एलईडी दिवे व त्यासाठी दिल्या जाणाऱ्या भूमिगत केबल इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी जवळपास सर्व चौकात रस्ता खणला आहे; मात्र सर्व चौकातील खणलेला भाग व्यवस्थितरित्या न करता आहे तसाच ठेवल्याने प्रत्येक चौकात नागरिकांना याचे धक्के सहन करावे लागत आहे. तर ठिकठिकाणच्या पदपथाची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने हा केवळ ठेकेदाराचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तरी प्रशासनाने संबंधित ठेकेदराला समज द्यावी, अन्यथा त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुशोभिकरणाद्वारे भाविकांच्या भावना दुखावल्या
आळंदीत ठीक ठिकाणच्या चौकांचे सुशोभिकरणाची कामे उद्यापर्यंत झालेली नाहीत. तसेच स्वच्छ सुंदर आळंदीच्या नावाखाली स्वच्छ संरक्षणाचे तीन तेरा वाजवले आहेत. तर आळंदी तीर्थक्षेत्राचे प्रतिक म्हणून पवित्र असणारी “विणा’ हा फ्रुटवाले धर्मशाळेजवळ प्रदक्षिणा मार्गावर उभरली आहे.
मात्र, त्याच्या लगतच स्वच्छ संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या ओल्या-सुक्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. तरी हा विणा एकतर उंचावर ठेवावा अन्यथा त्या शेजारी असणाऱ्या कचराकुंड्या हटवण्यात याव्यात, अशी भाविकांची मागणी आहे.
वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली
आळंदीतील ठेकेदाराच्या गैरकारभाराच्या कामाविषयी अनेकवेळा नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. तर नगरपालिकेचे मुख्याधिकार समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजंता उमरगेकर यांनी वेळोवेळी सूचना करून आदेश देऊन देखील ठेकेदार आपल्या मनमानीनुसार वागत असून वरिष्ठांच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.