पुणे | पोलीस महासंचालकांनी काढला पळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दोघा संगणक अभियंत्यांना चिरडून मारणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल थेट कचऱ्यात टाकून देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलीस, ससून, उत्पादन शुल्क अशा सर्वच यंत्रणांवर चौफेर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे.
यातच आमदार टिंगरेची उपस्थिती चर्चेेची झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज (गुरुवारी) एका बैठकीस पुण्यात उपस्थित होत्या. त्यांनी अग्रवाल प्रकरणावर बोलण्यास नकार देत बैठक संपल्यावर थेट मुंबईकडे पळ काढला. यामुळे शुक्ला यांची भूमिका वादात सापडली आहे.
महासंचालक रश्मी शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींना टाळण्यासाठी बैठक पोलीस आयुक्तालयात न घेता पाषाण येथील वायरलेसच्या कार्यालयात घेतली. त्यांची बैठक सुमारे दोन तास चालली होती. माध्यम प्रतिनिधींना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी शुक्ला यांना निरोप दिला, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निरोपही दिले.
मात्र, शुक्ला यांनी निरोपांकडे कानाडोळा केला. बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा माध्यमांना टाळण्यासाठी मागच्या दरवाजाने निघून गेला. याप्रकरणी खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात येत पोलिसांची भूमिका मांडली होती, तर पालकमंत्री अजित पवार यांनीही कोणाला पाठीशी घालणार नसल्याचे सांगितले. मात्र, शुक्ला यांचे या प्रकरणावरचे मौन शंका निर्माण करणारे ठरले आहे.





