माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मागणी….
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून धोत्रे येथील सुमारे 200 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरीक बेघर झाले. या भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.
तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या भागातील नुकसानीची कोल्हे यांनी पहाणी करून संकटात सापडलेल्यांना तातडीची मदत संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने देवुन मतदारसंघात संकटकाळी नागरीकांच्या मदतीला संजीवनी कायम पुढे असते हे दाखवून देत धिर दिला. कोल्हे यांच्या समवेत यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव तलाठी ग्रामसेवक व विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील धोत्रे, तळेगाव मळे, खोपडी या भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार केला. येवला तालुक्यातील उंदीरवाडी व इतर गावातील छोटे छोटे बंधारे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होते. ज्यास्तीचे पाणी कोपरगाव तालुक्यातील गावामध्ये घुसल्याने शेकडो घरे पाण्यात गेली,शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने आर्थिकदृष्टया विवंचनेत असलेल्या शेतकरी बांधवांनी ओढाताण करून याभागातील शेतक-यांनी संपुर्णत: पेरण्या केल्या होत्या, परंतु सुमारे तीन तास सुरू असलेल्या या पावसाने पेरण्याही वाहुन गेल्याने दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढावले आहे.
तर सुमारे दोनशे घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्यासह संसारपयोगी साहित्य वाहुन गेले, नागरीकांना रात्र पाण्यात जागून काढावी लागली. अनेक कांदाचाळीचे मोठे नुकसान झाले, फळबागाही कोलमडून पडल्या. हि विध्वंसक स्थिती पावसाने केल्याने कोल्हे यांनी उपस्थित अधिका-यांना नुकसानीची तीव्रता लक्षात आणून देत शेतक-यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, नुकसान भरपाई तात्काळ शेतक-यांना मिळण्याची मागणी केली.
सोमवारी सायंकाळी मेघगर्जेनेसह झालेल्या अतिवृष्टीमुळे धोत्रे गावाला नदीचे स्वरूप आले होते, सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे जनावरे, वयोवृध्द नागरीक, लहान मुले भयभीत झाले होते,पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली होती. या घटनेनंतर ची माहीती कळताच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी तात्काळ संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनास्थळी पाठवून पावसाच्या पाण्यात आडकलेल्यांना रात्री उशिरापर्यंत मदत केली.
यावेळी सरपंच अशोक गवारे, विजय जामदार, सुरेश जाधव, प्रदिप चव्हाण, मनोज चव्हाण, भगवान चव्हाण, अजीमभाई शेख, नासीरभाई शेख, सोहेल शेख, नुरा शेख, अशोक माळवदे संदीप भाटे, मनोज पाडेकर, संजय जामदार, महेद्र आगवण, गोकुळ गायकवाड, विजय काटे, नितीन शिंदे, शकील शहा, युनुस शहा, बाबासाहेब पाडेकर, किरण चव्हाण, गोरख टुपके, पोलीस पाटील देवेश माळवदे, ग्रामसेवक अविनाश पगारे, कामगार तलाठी शुक्ला, बाळासाहेब शिंदे, अमोल शिंदे आदीनी मदत कार्यात सहभाग घेतला.