पिंपरी – सध्या ऑनलाइन खरेदीवर अनेकांचा भर आहे. यात ग्राहकांचा पैसा वाचत असला तरी ही खरेदी आता पर्यावरणासाठी धोक्याची ठरू लागली आहे. यात पॅकेजिंगवर खूप लक्ष देण्यात येते. यामुळे वस्तू सुरक्षित येते पण, यातून पॅकेजिंग वेस्टचे नवे संकट उभे झाले आहे. अनेक ठिकाणी या पॅकेजिंग वेस्टचे ढिग लागत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची अडचण निर्माण झाली आहे.
हिंजवडी व तळवडे भागात आयटी कंपन्या असून येथे काम करणारे पिंपरी चिंचवड शहरात राहतात. ते उच्चशिक्षित असल्याने बहुतांशजण खरेदीसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडतात. ऑनलाइन खरेदीत पॅकेजिंगकरिता मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापर होतो. एका वस्तुला प्लॅस्टिकची अनेक आवरणे असतात. यामुळे वस्तु सुरक्षित पोहोचते. पण, त्या नंतर निर्माण होणाऱ्या समस्येबाबत मात्र कुठेच विचार होत नाही. वस्तू खरेदी केल्यानंतर ती घरी येताच खरेदी करणारा व्यक्ती त्याचे पॅकेजिंग कचऱ्यात टाकतो. तो कचरा डेपोत पोहोचतो किंवा काही ठिकाणी पॅकेजिंगचे हे साहित्य रस्त्यावर पडून दिसते. शासनाने काही प्लॅस्टिकवर बंदी घातली असली तरी या ऑनलाइन खरेदीत त्याचा खुलेआम वापर होत आहे.
काही प्लॅस्टिक नियमात आहे. मात्र पॅकेजिंगकरिता वापरण्यात येत असलेल्या या पकिजिंगची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कुठेही कोणत्याही सूचना नाही. खरेदीत नागरिकांच्या घरी पोहोचत असलेल्या या पॅकेजिंग वेस्टची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या कंपनीची की खरेदी करणाऱ्या ग्राहकाची या संदर्भात नियमावली बनवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पर्यावरणासमोर पॅकेजिंग वेस्टची नवी समस्या निर्माण झाली आहे. मिळत असलेल्या वेस्टमध्ये साधारणतः 40 ते 50 टक्के वेस्ट है पॅकेजिंगचे असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन खरेदी बेलगाम आहे. यामुळे ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाय आणि पर्याय शोधावे, असे मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
…अन्यथा मोठी समस्या
पर्यावरणासमोर सध्या सर्वात मोठी समस्या प्लॅस्टिकची आहे. यात 40 ते 50 टक्के पॅकेजिंग वेस्ट मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या या पॅकेजिंग वेस्टमुळे त्याच्या रिसायकलिंगची जबाबदारी कोणाची, खरेदी करणाऱ्या ग्राहकाची की विकणाऱ्या कंपनीची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर वेळीच नियमावली बनवली नाही तर मोठ्या संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
वापरलेल्या साहित्याची माहिती कंपनीकडे
ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू ग्राहकाकडे पाठविताना तिच्या पॅकेजिंगकरिता वापरण्यात येत असलेल्या साहित्याची माहिती आणि त्याची संख्या त्या कंपनीकडे आहे. मग, त्या साहित्याची रिसायकलिंग करण्याची जबाबदारी या कंपन्यांनी उचलने सहज शक्य आहे. असे केल्यास पर्यावरणासमोर निर्माण झालेल्या समस्येवर सहज तोडगा काढता येईल, असे काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून सांगण्यात येत आहे.