राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के

मुंबई : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल (दि.१२,सोमवार) दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १५ लाख ३५ हजार ३१५ झाली आहे तर राज्यात आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत (दि.१२,सोमवार) पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल (दि.१२,सोमवार) १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.





