नाणे मावळ – मावळ तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत प्रजिमा 78 ते कोंडीवडे रस्ता मंजूर करण्यात आला. 2019 पासून सुरू असलेले काम अद्याप अंदाजपत्रकानुसार पूर्ण करण्यात आलेले नाही. हे काम 2020 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित असताना जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार बिनधास्त आहे. पाच वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडे असताना आज रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडलेले असताना ठेकेदार याकडे बघण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून राहिलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोंडीवडे रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता प्रजिमा 78 ते कोंडीवडे ना. मा. असा आहे. पकेज क्रमांक पीयूएन 87, एकूण लांबी 2.4 किमी, डांबरी रस्ता 2.25 कि.मी., कॉंक्रिट रस्ता 0.15 किमी, पूल मोऱ्या 12 नग, अंदाज पत्रकिय किंमत 131.92 लक्ष, पंच वार्षिक देखभल व दुरुस्ती किंमत 7.73 लक्ष, काम सुरू करण्याचा दिनांक 7 मार्च 2019 काम पूर्णत्वाचा दिनांक 6 मार्च 2020, देखभल व दुरुस्ती दिनांक 7 मार्च 2020 ते 6 मार्च 2025 असा आहे. या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. साधारण चार वर्षे होऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना या मार्गाने प्रवास करणे कठीण झाले आहे.
प्रशासनाने अपूर्ण अवस्थेत पडलेला रस्ता व अतिक्रमण काढून पूर्ण करावा. ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्या ठिकाणी पुन्हा काम करावे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अपूर्ण रस्त्याची काम तात्काळ चालू करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी
काही ठिकानी मोऱ्यांवर सिमेंटचे कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. रस्त्यालगतच्या मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. रस्त्याचे काम शासकीय अंदाजपत्रकानुसार करण्यात आलेले नाही. काम पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदाराने केलेल्या कामाची पोलखोल झाली आहे. सध्या ठेकेदार तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी खडी टाकून खड्डे बुजवित आहे. परंतु कायमस्वरुपी मोऱ्यांवर कॉंक्रिटीकरण व रस्ता चांगला कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्ता समस्यांच्या विळख्यात
कोंडीवडे हद्दीमध्ये रस्त्याच्या पश्चिम बाजूला अतिक्रमण काढले नाही. तसेच कोंडीवडे स्मशानभूमीपर्यंत रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडलेला आहे. त्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या रस्त्याला खड्डेच खड्डे पडलेले असून एक प्रकारची रस्त्याची चाळण तयार झाली आहे. शिवाय रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी खडी, गोटे पडलेले आहेत. तसेच रस्त्यावरचे डांबर निघून गेले आहे. रस्त्यावर येणारे-जाणारे प्रवासी, व्यावसायिक वर्ग, शेतकरी वर्ग, दूध व्यवसाय, विद्यार्थी वर्ग यांना या खड्डेमय रस्त्यामुळे जाणे-येणे अवघड झाले. हा रस्ता कामशेत ते जांभवली ह्या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. विशेषता म्हणजे रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. दोन्ही साइडपट्ट्या पूर्णपणे ररस्यापेक्षा 1 ते 2 फूट खाली गेल्या आहेत.
वाहनचालकांना अपघाताचा धोका
रस्ता चढउताराचा आहे. रस्त्यावर केवळ खडी टाकून डांबर टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी रस्त्यात साचून राहत आहे. त्यामुळे रस्ता खराब होत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढली आहेत. खड्डेमय रस्त्यावर प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा दररोजचा प्रवास देखील कष्टप्रद सुरू आहे.