पुणे – कर्मचाऱ्यांअभावी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील उद्यानांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या वर्षभरापासून उद्यानांची योग्यप्रकारे देखभाल आणि दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने तातडीने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. मात्र, बोर्डाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राणी लक्ष्मीबाई, जे.जे. गार्डन, जनरल भगत, जय जवान, प्रताप गार्डन, हमारा उद्यान, बायसेंटिनल गार्डन, एकता पार्क, सवेरा गार्डन, ध्यानचंद गार्डन, नाला पार्क, शहीद भगसिंग अशी मिळून सुमारे 12 उद्याने आहेत. या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केवळ 4 ते 5 कर्मचारी उद्यान विभागात आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे या उद्यानांची योग्य देखभाल, दुरुस्ती झालेली नाही. त्यातच सध्या सुरू असलेल्या करोना महामारीदरम्यान विभागाचे दोन कर्मचारी बाधित झाले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
तसेच, आणखी एक कर्मचारी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यामुळे उद्यान विभागामध्ये सध्या कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बोर्डातील लोकप्रतिनिधींनी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबतचा प्रश्न ब्रिगेडिअर कुलजितसिंह यांच्या समोर मांडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार हेदेखील उपस्थित होते.
पावसाळ्याच्या तोंडावर रखडली वृक्षांची छाटणी
लष्कर परिसरातील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी बोर्डाकडे सातत्याने मागणी होत आहे. मात्र, उद्यान विभागातील कर्मचारीअभाव आणि छाटणी यंत्राची उपलब्धता नसल्याने ती होत नाही. परिणामी आगामी काळात परिसरातील नागरिकांना यामुळे धोका उद्भवू शकतो.