गुंजवणी, विमानतळ, लॉजिस्टिक पार्कबाबत चकार शब्दही नाही
सासवड – पुणे जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चार वेळा रद्द होऊन पाचव्या वेळेस थाटामाटात संपन्न झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष असलेल्या पुरंदर विमानतळ, गुंजवणी, नव्याने होऊ घातलेल्या लॉजिस्टिक पार्क यासारख्या प्रकल्पांवर मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा पुरंदरवासीयांबरोबरच पुणे जिल्हा जिल्ह्यातील नागरिकांना होती; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पावर कोणतेही भाष्य न करताच निघून गेल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पुरंदरच्या विमानतळावर सुचोवात केला. यावर मुख्यमंत्री यांच्या कडून काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा भंग झाल्याची चर्चा कुजबुजत होती. पुणे जिल्ह्यातून आलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती यामध्ये प्रत्येक नागरिकाला काही ना काही मिळणार अशा आशयाचा प्रचार शासनाकडून करण्यात आला होता; परंतु या ठिकाणी आल्यानंतर लाभार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला असल्याच्या देखील प्रतिक्रिया काही लाभार्थींनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. तर लाभार्थ्यांना जेवण किंवा नाश्त्याचे गैरसोय झाल्याची देखील चर्चा सध्या होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंजवणी धरणाच्या आडचणी दुर करून हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करू असे आश्वासन या कार्यक्रमात दिल्याने आता गुंजवणी धरणाच्या पाण्याचा प्रश्न अजित पवार सोडवणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस गुंजवणीच्या पाण्याचे श्रेय घेणार असल्याचे बोलले जात आहे. तर विमानतळावर संजय जगताप व विजय शिवतारे यांनी बसून मार्ग काढावा असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांवर मौन बाळगल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेची अडचण होणार का? अशी देखील कुजबुज सुरू आहे.
चार झेंड्याच्या आड एक राष्ट्रवादीचा
पुरंदर तालुक्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला असला तरी संपूर्ण जेजुरी शहरांमध्ये सर्वाधिक शिंदेच्या शिवसेना धनुष्यबाणाचा प्रचार सर्वाधिक करण्यात आला होता. त्या खालोखाल भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात्र तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळत असल्याचे पाहावयास मिळत होते. चार झेंड्याच्या आड एक राष्ट्रवादीचा झेडा असे समिकरण ठरवले आसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते.
आमदारांना दुय्यम दर्जाचे स्थान
शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होता या उपक्रमासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम पुरंदर हवेली मतदारसंघांमध्ये होत असताना पुरंदर हवेलीच्या आमदार संजय जगताप यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने त्याचबरोबर निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव देखील शेवटच्या स्थानावर छापल्याने आमदारांना दुय्यम दर्जाची वागणूक प्रशासनाकडून मिळाली असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.