नवी दिल्ली – देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी रविवारी केला. मध्य प्रदेश विधानसभा चालू रहावी आणि कॉंग्रेसचे सरकार पाडले जावे, केवळ यासाठीच केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरू ठेवले असा आरोप त्यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी हा आरोप केला.
मध्यप्रदेशचे कॉंग्रेसचे सरकार पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या सरकरमध्ये मंत्रिमंडळ नाही, कोणीही आरोग्य मंत्री किंवा गृह मंत्रीही नाही. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये राज्य सरकारची ही वाईट अवस्था आहे. भाजप सरकारने मध्यप्रदेशच्या जनतेला मूर्ख बनवले आहे, असा आरोपही कमलनाथ यांनी केला. जगात कुठेही असे घडले नाही, असेही ते पुढे म्हणाले.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील स्थिती अतिशय वाईट झाली आहे. जर आणखीन चाचण्या केल्या तर रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसून येईल, असेही कमलनाथ म्हणाले. करोनाच्या साथीमुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज आवश्यक आहे. या पॅकेजचा लाभ कोणत्या क्षेत्रांना मिळतो आहे, यावरच त्या पॅकेजचे यशापयश अवलंबून असेल, असेही कमलनाथ म्हणाले.