मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. यातच आता जितेंद्र आव्हाडांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल”, असे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल … #मोहंमद_तुघलक
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2023
याआधी संजय राऊत यांनी देखील नोटबंदी प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले होते. राऊत म्हणाले होते की, “गाजावाजा करुन दोन हजारांची नोट आणली होती. आता ती बंद केली. काळापैसा परत आणू, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचं कंबरडं मोडलं जाईल असे म्हणाले होते, ते काहीच झालं नाही. लोकांना रांगेत उभं केलं. पुन्हा केंद्र सरकार त्याच मार्गावर आल्याचे म्हणत हजार, पाचशे रूपयांची नोटबंदी केली ती नोट परत येणारे का? मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा केला आहे. ”
23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी
दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील. त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.