Nashik Kumbh Mela | नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. मात्र, सरकारकडून या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे, सरकारच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त असून तीव्र विरोध दर्शवला आहे. यासाठी नागरिक, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. यावरून ठाकरे गटाच्या सामनातील रोखठोकमधून टीका करण्यात आली आहे. कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण हा सर्व पैसा शेवटी गुजरातचे ठेकेदार घेऊन जाणार आहेत, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे. सर्व ठेके गुजरातच्याच लोकांना दिले जातील नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 हजार कोटींचे बजेट मंजूर केले आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचे बजेट 20 हजार कोटी होते. रस्ते, स्वच्छता, नदीतल्या बोटी, सुरक्षा, साधूंची व्यवस्था, श्रद्धाळूंची व्यवस्था यावर हा खर्च होतो. प्रयागराजमधील या सर्व कामांचे ठेके गुजरातच्या लोकांना मिळाले. हे ठेके गुजरातच्याच लोकांना मिळावेत यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनावर दबाव होता. आता नाशिकच्या कुंभमेळ्याचे सूत्रधार मंत्री गिरीश महाजन आहेत. 25 हजार कोटी कुंभमेळ्याचे म्हणून त्यांच्या खिशात आहेत. नाशकातदेखील सध्या गुजरातच्या ठेकेदारांचा वावर वाढला आहे. म्हणजे नाशिक कुंभमेळ्याचे बहुतेक सर्व ठेके गुजरातच्याच लोकांना दिले जातील. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन व त्यांचे लोक या ठेक्यातून फार तर मोठी टक्केवारी वसूल करतील. कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण हा सर्व पैसा शेवटी गुजरातचे ठेकेदार घेऊन जाणार आहेत, असे सामनात म्हंटले आहे. कुंभमेळ्याच्या पैशांवर भाजपला राजकारण करायचे सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या भूमिपुत्रांवर संकट बनून कोसळला आहे. नाशिकच्या स्थानिक लोकांना अशा प्रकारे निराधार, बेरोजगार करणारा कुंभमेळा कोणते धर्मकार्य पार पाडणार आहे? पंतप्रधान अयोध्येतील धर्मध्वजारोहण सोहळ्यात सांगतात, ‘रावणाविरोधातील लढाईत रामरथाप्रमाणे भारताचा विकास रथ गतिमान करण्यासाठी संयम, सत्य, सद्वर्तन, शक्ती आणि करुणेची गरज आहे.’ अर्थात ही करुणा धर्म सोहळ्याच्या आयोजनात कोठेच दिसत नाही. प्रयागराजमध्ये शेकडो लोक चिरडून मरण पावले. नाशिक कुंभमेळ्यात लोकांच्या घरादारांवरून बुलडोझर फिरवला, झाडांच्या कत्तली केल्या त्या फक्त धर्मातील राजकारण पुढे नेण्यासाठी. कुंभमेळ्याच्या पैशांवर भाजपला राजकारण करायचे आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ठेकेदारीवर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा निशाणा भाजपवर सामनातून साधण्यात आला आहे. Nashik Kumbh Mela | भाजपने श्रीरामांचे अपहरण केले व रावणाच्या मार्गाने देशाला नेत आहे कुंभमेळा म्हणजे विकास नाही, कुंभमेळा म्हणजे नाशिकबाबत भाजपने केलेली वचनपूर्ती नाही हे नाशिककरांनी समजून घेतले पाहिजे. ज्या गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याचे मंत्री केले आहे ते 25 हजार कोटी रुपये घेऊन गुजराती ठेकेदारांच्या गोतावळ्यात बसले आहेत. कुंभमेळ्यात कोणत्या पातळीवर भ्रष्टाचार सुरू झाला ते सीसीटीव्हीच्या एका टेंडरवरून समोर आले. सीसीटीव्हीचे काम नऊ कोटींचे, पण ते सरळ 300 कोटींवर नेऊन आपल्या ठेकेदारांना टेंडर दिले. प्रत्येक कामात आता हेच घडणार व याच पैशांवर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवून ‘धर्मध्वजा’ फडकवली जाणार. संपूर्ण देशात यापेक्षा वेगळे काही चाललेले दिसत नाही. राम-रावण युद्धात सत्याचा विजय झाला, पण आता भाजपने श्रीरामांचे सरळ अपहरण केले व रावणाच्या मार्गाने देशाला नेत आहे. धर्मध्वज वगैरे ढोंग आहे, असा आरोप देखील सामनातून करण्यात आला. Nashik Kumbh Mela | हेही वाचा: खालापूरमध्ये राजकीय भूकंप! “मी युतीधर्म पाळला नसता तर…”; तटकरेंनी थोरवेंना सुनावले खडे बोल