महापुरामुळे फरशी पुलांचे मोठे नुकसान; दळणवळण ठप्प होण्याची शक्यता
पाटण – पाटण तालुक्यात पूर परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कोयनानदी वरील बांधण्यात आलेल्या नेरळे, मुळगाव, सांगवड पुलाचीही मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे लोखंडी अँगल तुटले असून पिलर ही कमकुवत झाले आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दळणवळणासाठी कोयनानदीवर असणारे हे पूल सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत.
पाटण तालुक्यात पुरामुळे लोखा रूपयांची हानी झाली आहे.
नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. शालेय विद्यार्थ्यांचे शालोपयोगी साहित्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. पुराच्या पाण्यामुळे कोणाची घरे पडली आहेत तर सलग पाच दिवस पाणी घरात असल्याने काहींची घरे कमकुवत बनली आहेत. ही परिस्थिती पुरबाधीत नागरिकांची असून दळणवळणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पूलांना ही पुराच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाल्याने सध्या या पुलांवरील वाहतूक नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागली आहे.
कोयना नदीवरील असणाऱ्या कोयना मार्केट संगमनगर धक्का नेरळे, मुळगाव, सांगवड पुल या सर्व पुलांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. धरण बांधल्या पासूनच्या इतिहासात कोयना मार्केटच्या बाजूला असणाऱ्या पुलावरून पाणी गेले नव्हते. मात्र या यावेळेस पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने मार्केटचा पुल पाण्याखाली गेला. संगमनगर धक्का येथील नविन पूल उंचीवर असूनही या पुलावरून पुराचे पाणी गेले. मात्र या पुल नविन असल्याने कोणताही धोका नाही.
तरीही नदीपलीकडील सुमारे 36 गावांचा संपर्क पुल पाण्याखाली गेल्याने तुटला होता. मोरगिरी विभागाशी जोडणारा नेरळे पुल पुराचे पाण्याने खचला आहे. मागील पूर परिस्थितही हा पूल पाण्याखाली गेला होता. यावर्षी पुराच्या पाण्याने पुलाला धोका निर्माण झाला असून लोखंडी अँगल तुटले आहेत तर बाजूस असणारा भराव वाहून गेल्याने पुलाचे पिलर कमकुवत बनले आहेत. एखादे अवजड वाहन गेल्यास पूल कंप पावतो. यासाठी बांधकाम विभागाने पुलाची चाचणी करणे गरजेचे आहे.
पाटणच्या दक्षिण विभागाला जोडणारा मुळगावचा पुल हा नदी पलीकडील गावांच्या दळणवळणासाठी महत्वपूर्ण आहे. मात्र कायम पुराच्या पाण्याचा सामना करणारा हा मुळगावचा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पुल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे कोयनेला आलेल्या पुरातून वाहून आलेली झाडे, लाकडे या पुलात आडकून शिल्लक राहिलेले लोखंडी अँगल तुटले असून पिलरही कमकुवत बनले आहेत. पुलाचे बांधकाम होवून 25 वर्षाचा कार्यकाळ लोटला तरी या पुलाची कोणतीही डागडुजी बांधकाम विभागाने केलेली नाही.
तरीही या पुलावरून वाहतुक सुरू असल्याने मोठा अनर्थ निर्माण होवू शकतो. त्यामुळे या पुलावरील अवजड वाहतुक बंद करावी, अशी मागणी होत आहे. नवरस्ता विभागाशी जोडणाऱ्या सांगवड पुलावरून पुराचे पाणी गेले नसले तरी पुराच्या पाण्यामुळे हा पुल कमकुवत झाला आहे. या पुलाचे पिलर कमकुवत झाले आहेत. या मार्गावरील हा जुना पुल असून पुलाच्या पलीकडे असणाऱ्या देसाई कारखान्याची ऊस वाहतुकीसह ढेबेवाडी, मरळी परिसरातील गावांच्या दळणवळणासाठी हा पुल महत्वाचा मानला जातो. पुलाच्या उभारणी पासून याची कसलीही डागडुजी केलेली नाही.
कोयना नदीवरील आसणारे नेरळे व मुळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. मात्र पुराच्या पाण्याने नुकसान झाल्याने वाहतुकीसाठी हे पूल योग्य आहेत का याची चाचणी करणे महत्त्वाचे आहे. जे जुने पूल आहेत त्याची चाचणी गरणे गरजेचे आहे. कोयना नदीवरील मुळगाव पूल फार जुना आहे. त्याची चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
एस. व्ही. पाटील , उपअभियंता, बांधकाम विभाग पाटण