शिंदे वासुली -ग्रामीण भाग म्हंटल की, रस्त्याचे वादविवाद आलेच. पण या परंपरेला छेद देत आसखेड खुर्द येथील गावकऱ्यांनी रस्त्याने बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेत उभ्या पिकांतून तब्बल दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता तयार केला आहे. यासाठी ग्रामपंचायतीने देखील मोलाचे सहकार्य केले आहे. गावकऱ्यांच्या या एकीचे आणि समजूतदारपणाचे कौतुक केले जात असून पिढ्यांन्पिढ्या रखडलेले काम अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत करून दाखविले आहे.
गेली 10-15 वर्षांपासून हा रस्ता शेतकऱ्यांमधील वादांमुळे बंद होता. गावात यायचे म्हंटल तरी शेताच्या बांधावरून यावे लागत असे. त्यामुळे हा रस्ता सुरू करण्याचे शिवधनुष्य गावकऱ्यांनी पेलण्याचे ठरविले. काम अवघड होते परंतु इच्छाशक्तीही प्रबळ होती. ज्यांच्या शेतातून रस्ता जाणार होता, अशा सर्व शेतकऱ्यांना रस्त्याची गरज होती;
परंतु आपापसातील हेव्यादाव्यांमुळे कुणीही रस्ता द्यायला तयार होत नव्हते. सर्वांची एकत्र मिटींग घेतली तर हे हेवेदावे उफाळून येतील म्हणून प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र भेट घेऊन त्याला रस्त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तब्बल महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर सर्व शेतकरी शेतजमीन रस्त्यासाठी देण्यास तयार झाले.
सुरुवातीच्या काळात गावकऱ्यांनी तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांच्याकडे या पाणंद रस्त्यासाठी निधीची मागणी केली. त्यांनी 3 लाख रूपये मंजुर केले होते. त्या निधीमध्ये ग्रामपंचायतीने 1 लाख रुपयांची भर टाकून गेल्या 15 दिवसांपूर्वी रस्त्याचे काम ज्यांच्या जमीनीतून रस्ता जात आहे त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू केले. पण अडचण अशी होती की सगळ्या शेतांमध्ये पिके होती; परंतु सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केले आणि उभ्या पिकांतून सुमारे दीड किलोमीटरचा भराव आणि मुरूमीकरणाचा रस्ता तयार झाला.
याकामी शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव लिंभोरे, काळूराम लिंभोरे, सरपंच सिमा लिंभोरे, उपसरपंच कविता लिंभोरे, अरूण लिंभोरे, पोलीस पाटील सुवर्णा लिंभोरे, तुकाराम लिंभोरे, अरूणा लिंभोरे, काशिनाथ लिंभोरे, हनुमंत लिंभोरे, दत्तात्रय लिंभोरे, मनोज लिंभोरे, भाऊसाहेब लिंभोरे, बाळू लिंभोरे, शिवाजी लिंभोरे, रोहिदास येळवंडे यांचे सहकार्य लाभले.
या पिकांतून काढला रस्ता
हा रस्ता करण्यासाठी संभाजी लिंभोरे यांनी टोमाटो, भागा नाना लिंभोरे यांनी लसूण, बबन लिंभोरे यांनी ऊस, नथु येळवंडे यांनी ज्वारी, बबन येळवंडे यांनी बटाटा, पाटीलबुवा येळवंडे यांनी हरभरा पिकातून रस्ता दिला.