कोरेगाव – कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यातील वांगणा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडायला सुरुवात झाली असतानाच, या योजनेची जलवाहिनी गुरुवारी दुपारी तीन ठिकाणी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ही जलवाहिनी एप्रिल-मे महिन्यापासून तिसऱ्यांदा फुटली असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने हा प्रकार घडत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यासह दुष्काळी भागासाठी वांगणा योजनेतून पाणी सोडण्याची विनंती आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी तात्काळ आदेश दिला होता. वांगणा योजनेतून पाणी सोडताच निकृष्ट दर्जाची जलवाहिनी किन्हई डोंगर परिसर, शेंदुरजणे आणि रांजणाई तलाव परिसरात फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी दिल्यावर जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केले. मात्र, या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष हणमंतराव जगदाळे, किन्हई विकास सोसायटीचे अध्यक्ष गजानन भोसले, विठ्ठलराव सुतार व प्रकाश होळ यांनी केला आहे. नवीन जलवाहिनी तातडीने टाकून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.