पुणे – उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली, तरी भाजप-शिवसेना जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. सोमवारी (दि. २९) रात्री युती तुटल्याचे चित्र भासवत इच्छुक शिवसैनिकांना संपर्क साधून एबी फाॅर्म दिले. मंगळवारी (दि. ३०) अर्ज भरण्याची मुदत संपण्यास एक तास राहिला असताना, पुन्हा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी युती तुटली नसल्याचे सांगितले. यामुळे युतीच्या चर्चेचे घोडे अजून दोन दिवस भिजत राहणार हे नक्की झाले. यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था, चिडचिड, संताप पहायला मिळाला. शिवसैनिकांच्या भावनांपेक्षा नेत्यांना स्वत:चे आणि मित्रपक्षाच्या मनाचा विचार अधिक असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपली. महापालिकेच्या १६५ जागांसाठी भाजप १४०, शिवसेना १६ आणि आरपीआय (आठवले गट) नऊ असा महायुतीच्या जागावाटपाचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. शिवसेना २५ जागा लढविण्यावर ठाम आहे. जागावाटपावर एकमत होत नसल्याने महायुतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादीसमवेत एकत्र लढण्याची चाचपणी केली. मात्र, अजित पवारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कात्रीत सापडलेल्या शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मंगळवारी सकाळी अचानक शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना महायुती तुटल्याने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. दुसरीकडे शिवसेना नेत्यांकडून ज्या प्रभागात शिवसैनिकांची ताकद आहे, अशा ठिकाणच्या उमेदवाराला एबी फाॅर्म देण्यात येत होता. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असता, ज्यांना एबी फाॅर्म मिळाले नाही त्यांनी संताप व्यक्त करत नेते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हा खेळ सुरू असतानाच शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत यांनी पुण्यात येऊन महायुती अभेद्य असल्याचे सांगत शिवसेना स्वबळावर लढणार किंवा राष्ट्रवादी समवेत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी वेळ मिळावा यासाठी उमेदवारांना वेळप्रसंगी उमेदवारी मागी घ्यावी लागेल असे सांगूनच एबी फाॅर्म दिल्याचे नेत्यांनी सांगितले. त्यामुळे युतीच्या चर्चेचे घोडे अजून दोन दिवस भिजत राहणार हे नक्की. त्यामध्ये शिवसैनिक वेटींगवर असून, उमेदवारी टिकणार की जाणार या संभ्रमावस्थेत आहेत. शिवसैनिकांचे आरोप आपटे रोडवरील रामी ग्रॅंड याठिकाणी शिवसेनेकडून इच्छुकांना एबी फाॅर्म देण्यात येत होते. त्यावेळी ज्यांनी एबी फाॅर्म मिळत होता, ते आनंदात फाॅर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी जात होते. मात्र, तासंतास थांबूनही एबी फाॅर्म मिळत नसल्यामुळे संतपालेल्या काही शिवसैनिकांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे चांगलेच वाभाडे काढले. आम्ही प्रामाणीकपणे पक्षाची कामे करायची आणि एनवेळी उमेदवारी दुसऱ्याला द्यायची. मर्जितल्याच उमेदवाराला उमेदवारी द्यायची होती तर आम्हाला कशाला बोलवायचे. यासह पैसे देऊन उमेदवारी दिली, पक्ष कमर्शियल केला. असे एक ना अनेक आरोप करत शिवसैनिकांना राग व्यक्त केला.