इस्लामपूर- मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसवण्याच्या नावाखाली गावातील आपल्याच मर्जीतील ठग आणि गुंडांची वर्णी लावण्यासाठी आखलेला हा डाव आम्ही हाणून पाडू. सोईस्कर पणे सहकारी संस्थांना सहा महिने मुदतवाढ आणि ग्रामपंचायतींवर प्रशासक अशी दुटप्पी भूमिका सरकार घेत आहे. ग्रामपंचायतीला सहा महिन्यांची मुदतवाढ द्या अशी मागणी सरकार व राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली .
ते म्हणाले,” ग्रामीण विकास मंत्रालयाने अध्यादेश काढून डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या १५ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करून गावातील एकाच व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक केली जाणार आहे. सातशे ते १५ हजार मतदान असणाऱ्या गावांत एकच व्यक्ती लायक आहे का ? गावातील एकच चांगली व्यक्ती कशी ओळखायची ? याबाबत कोणते तंत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विकसित केले आहे, हे जनतेसमोर आणावे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत गावाच्या विकासाचा आत्मा आहे.
घटनेप्रमाणे सुज्ञ मतदारांच्या माध्यमातून प्रशासक नेमायला हवा. गावात एकच व्यक्ती चांगली आणि संपूर्ण गाव अकार्यक्षम म्हणजे कारभाराला लायक नाही का ? असे मत सरकारचे असेल तर भविष्यात एकाच व्यक्तीने आमदार-खासदार निवडायचे का ? त्या एकाच व्यक्तीला जास्त समजते. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून एकाची नियुक्ती करताना दलाली करून अकरा हजार रुपये भरा आणि प्रशासक व्हा असा फंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात राबविल्याचे समोर आले आहे. अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष यांना दिलेली आहेत यावरून दलाली घेऊन पद देण्याची पद्धत गाव पातळीवर आणण्याचा राष्ट्रवादीचा घाट आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सहकारी संस्थां प्रमाणे सहा महिने मुदतवाढ द्या, नाहीतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अथवा सक्षम अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमा अशी आमची मागणी आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे प्रशासकीय अधिकारी कोरोनाच्या कामात व्यस्त आहेत असे सांगत आहेत. असे असले तरी ज्या त्या गावात तेच अधिकारी कोरोनाच्या कामात व्यस्त असतील तर त्यांना गावाची माहिती आहे मग त्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली तर बिघडलं कुठं ? असा प्रश्नही मंत्री खोत यांनी केला आहे. कोरोनाचा बाऊ करून सत्ता केंद्रीत ठेवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी घातला आहे असा आरोपही त्यांनी केला.