राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या गायिका सावनी रविंद्र यांची विशेष मुलाखत
पिंपरी – कोणतीही कलाकृती घडत असते, तेव्हा त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असतो. “बार्डो’ चित्रपटातील “रान पेटलं’ हे गाणं संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या सेटअपवर रेकॉर्ड केले गेले. अत्यंत भावुक करणार हे गाणार आहे. गाण्यातील तीव्रता, नेमका भाव पकडण्यासाठी दिवे बंद करून पूर्ण अंधारात हे गाणं मी गायिलं. त्या गाण्यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने खूप समाधान आणि आनंद वाटत आहे. ते गाणं अन पुरस्कार माझ्यासाठी खूपच “स्पेशल’ आहे, अशा भावना प्रसिद्ध गायिका आणि पिंपरी-चिंचवडच्या रहिवासी सावनी रवींद्र यांनी मंगळवारी (दि. 23) दैनिक प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केल्या.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीतून सोमवारी झाली. “बार्डो’ चित्रपटातील गीतासाठी पिंपरी-चिंचवड येथील सावनी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल गायिका सावनी रविंद्र म्हणाल्या, आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ देवाने आज मला दिले आहे. सर्व गुरूजनांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे कष्ट याचा यशात खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आजवर मी ज्या पद्धतीने गाणी गायिली त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून रसिकांना आवडतील, अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा कायम प्रयत्न करणार आहे.
“बार्डो’ अजूनही चित्रपट प्रतिक्षेत
“बार्डो’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. चित्रपटातील “रान पेटलं’ हे गाणं प्रचंड वेगळं आहे. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहन – रोहन यांचे संगीत लाभले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं रेकॉर्ड करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी माझ्याकडून “टोन’ बदलून विशिष्ट आवाजात हे गाणं गाऊन घेतलं. सावनी म्हणतात की, मी आजवर रोमॅंटिक, विरह गीते माझ्या नैसर्गिंक आवाजात गायिली आहेत. गाण्याची तीव्रता आणि गरज लक्षात घेऊन गाण्याचे बोल पाठ करून संपूर्ण अंधारात हे गाणं मी गायलेले आहे. गाणं रेकॉर्ड करून पाच वर्ष झाली आहेत. मात्र, आजही तो क्षण मी जगते आहे. मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या सेटअपवर हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं. अत्यंत भावूक करणारं हे
गाणं आहे.
नामांकने अनेक मिळाली, पुरस्कार पहिलाच
सावनी म्हणाल्या की, आयुष्यात पहिल्यांदा मिळालेला पुरस्कार सर्वात “स्पेशल’ असतो. मला आजपर्यंत विविध ठिकाणी नामांकने मिळाली. पण पुरस्कार कधी मिळाला नव्हता. मी गायिलेल्या गाण्यासाठी, मला पुरस्कार मिळावा या प्रतिक्षेत मी होते. आणि तो क्षण आला. मी गायन केलेल्या “रान पेटलं’ या गाण्यासाठी मला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त “स्पेशल’ आहे. मी ईश्वराची, रसिकांची आणि माझ्या सर्व गुरूजनांची कायम ऋणी असेन.
संक्षिप्त परिचय
गायिका सावनी रवींद्र या पिंपरी-चिंचवडच्या रहिवाशी आहेत. त्यांना कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभला. चिंचवड येथील शास्त्रीय गायक आणि अभिनेता असलेले वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकांतील गायिका, अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे या मात्यापित्यांकडून बालपणापासूनच त्यांना संगीताचे धडे मिळाले.
वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्याकडून विविध रागरागिण्यांची ओळख करून घेतानाच सावनी या नाट्यसंगीत आणि सुगम संगीतही गाऊ लागल्या. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी मराठी सुगम संगीताचे शिक्षण संगीत-दिग्दर्शक यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. सावनी रवींद्र यांचे शिक्षण पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांनी बी.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) केले आहे. भारती विद्यापीठातून एम.ए. (संगीत) हे शिक्षण घेतले.
तसेच, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या त्या संगीत विशारद आहेत. पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांच्याकडून भाव संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले. रवी दाते यांच्याकडे गझल गायकीचे आणि पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. तसेच, श्रीनिवास खळे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.