ठसका : (मारुती जैनक )- हुश्श्य।।…एकदाचं सूप वाजलं तर! वाजलं म्हणण्यापरीस संपलं. कुणाचं तोंड गोडावलं, तर कुणाचं कडवटलं. काहींच्या तर जिव्हाच होरपळून निघाल्या. आता तुम्ही म्हणाल, की हे कसलं पालुपद?..पण ह्यात पद असलं तरी कसलं पालुबिलू नाही. आम्ही सांगतोय ते आमदारकीच्या पदासाठी कालच उरकलेल्या इलेक्शनबाबत. लोकांनी हव्या असलेल्या “एलएमए’चं सिलेक्शन केलं. आमच्या लेखी इलेक्शन म्हंजे लोकशाहीचा उत्सवच! पुण्यनगरीत रंगलेल्या या उत्सवाची अखेर काल सांगता जहाली. हा उत्सव चांगलाच रंगला अन् काहीसा भंगलाही! आम्ही “याचि देही, याचि डोळा’ तो अनुभवला. अर्थात आम्ही कोण्या राजकीय पक्षात सक्रीय नसलो तरी निष्क्रीय मात्र आज्येबात नाही. “सर्व धर्म-सम भाव’ हे लोकशाहीचं तत्त्व. नुस्तं तत्त्व नव्हं, तर महातत्त्व! याच महातत्त्वाच्या भिंगातून राजकारणाकडं पाहणं ही आमची आदत. बाळकडूप्रमाणं ही आदत आमच्या हाडामासात भिन भिन भिनल्येय. म्हणुनशानंच “सर्व पक्ष-सम भाव’ या नीतीचे आम्ही पट्टीचे पाईक. अर्थात हा “पाईकपणा’ जपणं हे काय येऱ्या गबाळ्याचं काम नव्हं. आयच्यान, हे काम म्हंजे अशक्यातील अशक्यच. अक्षी शतप्रतिशत! असोत. तर आम्ही सांगत व्हतो, ते पुण्यनगरीत रंगलेल्या उत्सवाचं. या उत्सवात मोठमोठ्ठ्या पुढाऱ्यांच्या ऐकलेल्या (कानात बोळे कोंबून) भाषणांनी आमच्या ज्ञानात जाम भर पडली. इतकी, की आमचं टक्कुरच जाम जाहलं. धनशक्ती, जनशक्ती, कैवारी अशा कैक मोठमोठ्ठ्या शब्दजंजाळानं आमचं कानफाट शेकून निघालं. या शब्दांप्रमाणच मोठ्ठ्या असलेल्या नेते मंडळीनी या उत्सवात आवर्जून हजेरी लावली. मुक्कामे मौजे बारामतीकरांपासून दिल्लीश्वरांपर्यंत सारेच आल्ये. तेव्हा कुठे आम्हास प्रतिष्ठेचा खर्राखुर्रा शब्दार्थ उमगला. रातंदिवस पळ्ळापळ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहातून आम्ही “जागते रहो’चा धडा शिकलो. हे आम्ही या उत्सवातील हेरलेले रंग; पण या रंगांची जितकी प्रचिती आम्ही घेतली, त्याहून कैक पटीनं अधिक अनुभूती घेतली ती बेरंगांची. त्या अनुभूती आम्हास आरपार खुपल्या. म्हंजे साम, दाम, दंड ही लोकशाही विघातक अस्त्रेही या उत्सवात खुलेआम वापरली गेली. “नोट फॉर वोट’ या अनीतीची कुजबूजही आमच्या कानशिलापर्यंत येऊन धडकली. खचितच ते आम्हास मनोमन लागलं. पण करणार काय? आम्ही पडलो पामर. बेरंगांच्या अशा कैक कैफियती पोलीस ठेसनापर्यंत पोचल्या. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अस्सं बिरूद मिरवणारे पोलीसही शेवटी बापुडेच ठरले.
या साऱ्या कृष्णकर्मानं “नाठाळाच्या माथी हाणावी काठी’ या तुकोबांच्या उपदेशाचं आम्हास स्मरण झालं. पण “तुका म्हणे उगा राहावे, जे जे होईल ते ते पाहावे’, या त्यांच्याच उपदेशानं आम्ही फ्रिजरमध्ये डोस्कं घालून सोतास शांत करून घेतलं. तरीही आम्हास किव आली ती आमच्या लोकशाहीची. देश-राज्य चालवायला निघालेल्या या जाणत्यांनीच तिला अस्सं वेशीला टांगावं? हा सवाल आम्हास अजूनही टोच टोच टोचतोय. असोत. आता पुढेही लोकशाहीचे उत्सव भरतच राहतील. पण तेव्हा मात्र अशा बेरंगांची उधळण व्हणार नाही, हे साऱ्यांनी ठरवलं तर आम्ही धन्य व्हईल अन् आमची लोकशाहीसुद्धा.