नगर – नगर जिल्ह्याचे नामांतर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याबाबत दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये हा विषय चर्चेला आला असला, तरी राज्य सरकारने यापूर्वीच म्हणजे 7 सप्टेंबर 2022 व 3 नोव्हेंबर 2022 रोजी महापालिकेला पत्र देऊन महापालिकेच्या महासभेत नगरच्या नामांतराचा विषय घेऊन बहुमताचा ठराव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे नगरकरांची अथवा जिल्ह्यातील एकाही आमदार, खासदाराची मागणी नसताना जिल्ह्याबाहेरील आमदारांच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारच नगरच्या नामांतरासाठी घाई करीत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न दिवसान दिवस चिघळत चालला आहे. आता नामांतराच्या मुद्यावरून ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शहरअध्यक्ष संभाजी कदम यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले आहे की, ‘1985 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अहमदनगर शहरात सभा झाली होती. त्यावेळी नगर शहराला अंबिका नगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवले होते. त्याच नावासाठी आम्ही आजही आग्रही असून जर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची वेळ आली तर अंबिका नगर याच नावाचा ठराव आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.’