MLA Milind Narvekar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक स्तरावर किमान सहा महिने फक्त प्रवासी वाहने सोडण्यात यावीत. तर अवजड वाहनांना सोडू नये, अशी मोठी मागणी केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्य सरकारचा अत्यंत महत्वकांशी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यात यावा, असा आहे. त्यानुसार अर्धा तास वेळ कमी करण्यात येवून त्यामुळे अपघातात घट होणार आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटात जी वाहतूक कोंडी होत होती आहे, ती पूर्णपणे कमी होईल. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतूकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, सदर प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने आणि बोर घाटातील खोल दरीत मोठया प्रमाणात हवेचा दाब असून आणि पावसाच्या व धुक्याचे गडद क्षेत्र असल्याने सदर प्रकल्पातील सर्व तांत्रिक चाचण्या व अनुषंगिक कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरु करण्याची घाई कृपया करण्यात येऊ नये. तशा सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितास देण्यात यावी. अशी मागणी केली आहे. याशिवाय या पत्रात नार्वेकरांनी कोणत्याही प्रकारची इंधने अथवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहने या मार्गावर कधीही सोडण्यात येऊ नये म्हणून भविष्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही, असेही म्हटले आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकरांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे असणार आहे. आमदार मिलिंद नार्वेकर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या आमदारांनी काही महिन्यांपूर्वी मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केली होती. मिलिंद नार्वेकर हे सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य देखील आहेत. हेही वाचा : Kalyani Priyadarshan : बजेट 33 कोटी, कमावले 183 कोटी! ‘या’ अॅक्शनपॅक्ट चित्रपटाचा दुसरा भाग येण्यासाठी सज्ज; अभिनेत्रीने दिली मोठी हिंट