मुंबई – पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार धरल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आता या प्रकरणी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. केंद्राने कर कमी केले असताना राज्य नफेखोरीत व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आरोप प्रत्यारोपाचा हा खेळ सुरक्षीत आणि गैरकृत्य लपवण्यासाठी उपयुक्त आहे. पण त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ज्या वेळी केंद्र सरकारने इंधनावरील एक्साईज ड्यूटी कमी केली होती, त्यावेळी राज्यांनीही तसं करण्याची विनंती केली होती.
पण महाराष्ट्रासह गैर भाजप शासित राज्ये ही केवळ नफेखोरीत व्यस्त राहिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडले गेले. महाराष्ट्र सरकारने कर कमी न करता आतापर्यंत 3400 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी इंधनावरील कर कमी करावेत आणि मराठी माणसासह सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.