Mumbai Municipal Corporation Election : ठाकरे बंधूंची मुंबईत आणि ठाण्यात मोठ्या दिमाखात भव्य स्वरुपाची सभा पार पडली. या दोन्ही सभेतून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. याच सभेतून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी दुबार मतदार यावर भाष्य केले. ते म्हणाले, मतदान केंद्रावर जर दुबार मतदार दिसले तर त्याच क्षणी फोडून काढा, असे आदेश राज यांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना दिले. अशातच आता ठाकरे बंधूंनी या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार आहेत. मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान हे गैरप्रकार टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण यांनी हा निर्णय घेतला आहे. तब्बल दोन हजार गार्डची नेमणूक करण्याचे काम सुरू असून, हे गार्ड गैरप्रकारांवर करडी नजर ठेवणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरीच्या मुंद्यावर ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता पुन्हा एकदा यावर लक्ष केंद्रीत करून शिवसेना उबाठा आणि मनसेकडून हा अनोखा प्रयोग केला जात आहे. ज्यावेळी राज्यात मतचोरीचा मुद्दा तापला होता. त्यावेळी शिवसेना उबाठा आणि मनसेच्या वतीने आयोजित संयुक्त सभेतून राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. मुंबईत याच मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला होता. राज्यातील लाखो दुबार मतदारांची माहिती उघडकीस आणण्यात आली होती. भगवा गार्डची जबाबदारी देण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार, आता शिवसेना उबाठा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भगवा गार्ड हे विषेश पथक तैनात असेल. प्रत्येक मतदान केंद्राजवळ आणि आसपासच्या परिसरात भगवा गार्ड कार्यरत असतील. मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आढावा घेण्याचे काम या गार्डकडून करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे. हेही वाचा : Monalisa: महाकुंभातील ‘मोनालिसा’ची पहिली फिल्म, ‘द डायरी ऑफ मणिपूर’च पोस्टर प्रदर्शित