पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाजच थंडावले आहे. विविध परीक्षा कोणामार्फत घ्यायच्या याबाबत राज्य शासनाकडून अद्याप काहीच “ग्रीन’ सिग्नल मिळालेला नाही. दरम्यान, विविध परीक्षा घेण्यात काहीच चूक केलेली नसताना “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीचे कामकाज तुर्तास परीक्षा परिषदेने थांबविले आहे. यामुळे आगामी सर्वच परीक्षांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येत असतात. या परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपनीकडून निविदा मागवून त्यांना कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात येत असतो. मागील तीन वर्षे जी.ए. सॉफ्टवेअर ऍन्ड टेक्नॉलॉजी कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला होता. त्यानंतर पुढे आता तीन वर्षासाठी “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीला कामाचा ठेका देण्यात आलेला आहे.
2018, 2020च्या “टीईटी’ परीक्षेत लाखो रुपयांची उलाढाल करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आजी-माजी संचालकांनाही अटक करण्यात आली आहे. “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीचे सध्याला सौरभ त्रिपाठी, अनिल खराडे हे दोन संचालक आहेत. यात जी.ए.सॉफ्टेवर ऍन्ड टेक्नॉलॉजी कंपनीचे माजी संचालक म्हणून सौरभ त्रिपाठी यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आता, शिक्षक पात्रता परीक्षा, पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा, विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, संगणक व मॅन्युअल टायपिंग परीक्षा, डी.एल.एड. आदी परीक्षांचे कामकाज “विनर” कंपनीलाच देण्यात आले आहे. मात्र, जी.ए.कंपनीने “टीईटी’ परीक्षेत केलेल्या घोटाळ्यामुळे त्याचा फटका मात्र “विनर’ कंपनीला बसू लागला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने “विनर’ कंपनीचे कामकाज सद्यस्थितीला स्थगित केले आहे. विविध परीक्षा घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासनाच्या सूचनांनुसार परीक्षांबाबतची पुढील कारवाई करण्यात येणार आहे. “विनर’ कंपनीच्या संचालक पदावरुन सौरभ त्रिपाठी यांना हटविण्याच्या सूचनाही संबंधित कंपनीला देण्यात आलेल्या आहेत.
– दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद