प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची केल्याने शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्यास शिक्षकांची नोकरी करता येणार आहे. पदोन्नतीसाठीही परीक्षा उत्तीर्णतेची अट आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात आलेल्या आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेमध्ये अपवादात्मक परिस्थितीतच बदल होतो. याचे गांभीर्य ओळखून राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्य सरकार अथवा अन्य राज्यातील पुनर्विचार याचिकांवर अवलंबून न राहता शिक्षकांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्ली येथे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे , राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राज्य कार्याध्यक्ष किशन ईदगे, महानगरपालिका शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, चंद्रकांत यादव, सल्लागार रविंद्र घाडगे यांनी याचिकेच्या कागदपत्रांची पूर्तता, प्रतिज्ञापत्र व याचिकेशी संबंधित बाबींची पूर्तता केली. काही दिवसांपूर्वी शिक्षक संघटनांनी टीईटी सक्तीविरोधात २४ नोव्हेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने शासनालाही न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे.