यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये पुलावरून ऑटोचा भीषण अपघात झाला आहे. पुलावरुन ऑटो रिक्षा खाली कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातत ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून ते गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ऑटोमध्ये बकरा घेऊन हे सर्व जण नवस फेडायला जात होते. ऑटोमध्ये जवळपास १० जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर जखमींची आमदार इंद्रनील नाईक अन् गटविकास अधिकारी यांनी विचारपूस केली आहे.
पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलामधील लहान पुलावरून मालवाहू अँपे पलटी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता भरती करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
मुंबईतील अपघातात तिघे ठार
मंगळवारी सकाळीच ८ च्या सुमारास मुंबईच्या परळ पुलावर भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीला डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील तिघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये २ मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी परळ पुलावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत तरुणांची नावे तनिष पतंगे (वय-२४), रेणुका ताम्रकर (२५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.