कामशेत :आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव कंटेनर घुसल्याने एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, संतप्त नागरिकांनी जुना पुणे–मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीकडे निघालेली वारी दिंडी कामशेत भागातून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरने तीला जबर धडक दिली. या धडकेत एका वारीकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच वारीकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पडलेला असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवला. घटनास्थळी कामशेत पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, कंटेनर चालक फरार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून, अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी आणि स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे. “वारकरी दिंडीला गेलेल्या श्रद्धाळूंचा जीव या बेदरकार वाहतुकीमुळे गेला, प्रशासनाने तत्काळ दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.