- पावसाची “विश्रांती’ : मावळ, पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली
– निलेश ठाकर
पवनानगर – पावसाचे दडी मारल्यामुळे मावळ आणि पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणाने यंदा जुलैअखेर तळ गाठला आहे. पावसाच्या “विश्रांती’मुळे भातशेतीबरोबरच सिंचनाची सोय असलेला शेतकरीही काळजीत पडल्याचे चित्र आहे. सध्या पवना धरणात 34.45 टक्के पाणीसाठा असून, हा साठा गेल्या दहा वर्षांतील निच्चांकी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याचे तहान भागविणाऱ्या पवना धरणाची 8.512 टीएमसी साठवण क्षमता आहे. पवना धरणातील पाणीसाठा यंदा अत्यंत कमी शिल्लक राहिला आहे. पवना धरणात आजअखेर मंगळवार (दि. 28) 34.45 टक्के (1982.50 फूट) पाणीसाठा आहे.
गेल्या वर्षी आजअखेर पवना धरणात 65 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 1 जूनपासून पवना धरण परिसरात 1576 मि.मी. एवढा पाऊस झाला होता. मात्र यावर्षी पवना धरण परिसरात 1 जूनपासून 498 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पवना धरणात गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा यावर्षी शिल्लक आहे.
गतवर्षी पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. चांगल्या पावसामुळे जुलै महिन्यात पवना धरणातून विसर्ग करण्यात आला होता. मात्र यावर्षी पावसाच्या विश्रांतीमुळे धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला. दमदार पाऊस नसल्यामुळे भातलावणी रखडली आहे. त्यामुळे शेतकरीही चिंतातूर झाले असून, शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पुढील काही दिवस पाऊस पडला नाही, पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण होणार आहे. तर पवना धरण भरेल कधी याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. याशिवाय नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पवना धरणात 75 दिवस पुरेल एवढा पाणीसाठी आजअखेर शिल्लक आहे. जून, 28 जुलैपर्यंत 498 मिलीमीटर इतका पाऊस पडला. पुढील काही दिवस पावसाची वाट पाहवी लागेल. यदाकदाचित पावसाने दडी मारली, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
धरणात 75 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा
मावळ तालुक्यात पावसाने ओढ दिली असून, दररोज 5 ते 6 मिलीमीटर पाऊस पडतो. सध्या धरणात 34 टक्केच पाणीसाठी शिल्लक असल्याने पुढील दोन महिने पुरेल एवढाच साठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे पाच ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहून पाणीवापराबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मार्च, एप्रिल, मे या लॉकडाऊन काळात पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव नगरपरिषद, देहू कॅंटोन्मेंट बोर्ड (रावेत) यांना नऊशे ते सव्वा नऊशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. जून, जुलै महिन्यात हा साठा आठशे दशलक्ष लिटरपर्यंत कमी केला आहे.
पवना धरणात आजअखेर 34.45 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा 70 ते 75 म्हणजे साधारणात अडीच महिने पुरेल इतका शिल्लक आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस नाही पडला, तर पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा गैरवापर टाळावा. धरणातून पिण्यासाठी 400 क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. 27 जुलैपासून धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
– अनवर तांबोळी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पवना धरण.