Telangana Election Result 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर आतापर्यंत काँग्रेसने 61 जागांवर आघाडी घेतली असून बीआरएसला 38 जागांवर आघाडी मिळाली आहे. मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएससाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघात तगडी टक्कर दिल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना पिछाडीवर टाकले आहे.
रेवंत रेड्डी कोण आहेत ?
तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. जर काँग्रेस पक्ष तेलंगणात सत्तेत आला तर रेवंत रेड्डी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे मानले जात आहे. रेवंत रेड्डी हे 17व्या लोकसभेचे सदस्य आहेत. मल्काजगिरी मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी संसद गाठली. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता.
2014 सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर 2017मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना 2021 मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले. रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. पुढे 2007 साली रेड्डी यांना अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाली. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
दरम्यान, तेलंगणात काँग्रेस आघाडीवर येताच तेथील कार्यकर्त्यांनी काँग्रेस हैदराबादमधील पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले. तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी तेलंगणात काँग्रेसने मोठी तयारी केली आहे. काँग्रेसने हैदराबादच्या ताज कृष्णा येथे लक्झरी बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, 119 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला 70 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास तेलंगणाचे काँग्रेसचे निरीक्षक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसने 65 , BRSने 35, भाजपने 9 आणि AIMIM ने 3 जागांवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.