प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. दोन आठवड्यांच्या आत याबाबत कार्यवाही न केल्यास राज्यभरातील शिक्षक २४ नोव्हेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करणार आहेत, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य महापालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने दिला. राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षकांच्या विविध गंभीर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी टीईटी निर्णयाच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर सविस्तर चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून शिक्षकांना टार्गेट केले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, चुकीचे संदर्भ लावून शिक्षकांवर कारवाई केली जात असल्याने संतापही व्यक्त करण्यात आला. या वेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, संघाचे पदाधिकारी उदय शिंदे, संभाजी थोरात आदी उपस्थित होते.अनेक अनुभवी शिक्षक टीईटी पास नसल्याने त्यांची नोकरी धोक्यात आली आहे. ही बाब शिक्षकांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारी आहे. राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा; अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून राज्यात शाळा बंद आंदोलन करतील. या आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. टीईटी सक्तीचा निर्णय लागू करताना अनुभवी शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या सेवा-सुविधांवर संकट येऊ नये, अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली आहे.