मुंबई: करोनाशी आपण 3 महिन्यांपासून लढा देत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे चिंताजनक आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील लोक जलदरीत्या शोधणे हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून त्यांनी आज करोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील सहभागी झाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केल्याचा चांगला फायदा झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे आहे. यामध्ये तेथील जुने जाणते तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा.
आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत. या कामात कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत. त्याप्रमाणे कामकाज झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे, असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते. अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.