Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात बाळ जन्मल्यास मिळणार सोन्याची अंगठी; मुख्यमंत्र्यांची बंपर योजना; तब्बल 1.28 लाख अंगठ्यांची ऑर्डर जारी
Gold Ring Scheme : तमिळनाडू सरकार सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार आहे. 1.28 लाख अंगठ्यांसाठी ₹220 कोटी खर्च; निविदेतील एका पैशाच्या बोलीवरून वाद.

Gold Ring Scheme : सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांसाठी ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करण्याची तयारी केली आहे. या योजनेंतर्गत जून ते सप्टेंबरदरम्यान जन्मलेल्या 1,28,499 बालकांना प्रत्येकी एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
यासाठी सुमारे 220 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दोन प्रमुख ज्वेलरी कंपन्यांना अंगठ्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. तमिळनाडू सरकारची ही योजना आहे.
ही योजना 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी द्रविड चळवळीचे प्रमुख नेते सी. एन. अन्नादुराई यांची जयंती आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवणे आणि नवजात बालकाचा जन्म संस्मरणीय करणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे.
22 जूनपासून जन्मलेल्या बालकांना लाभ –
22 जूनपासून सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 22 जूनपासून योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने एका वर्षासाठी 4,41,667 सोन्याच्या अंगठ्यांच्या पुरवठ्यासाठी 755.83 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुरुवातीच्या 1,28,499 अंगठ्यांचे एकूण वजन सुमारे 128.5 किलो असून त्या 22 कॅरेट सोन्याच्या असतील. सोन्याच्या बाजारभावानुसार अंतिम खर्चात बदल होण्याची शक्यता आहे.
ज्वेलर्सना 70:30 प्रमाणात काम –
अंगठ्यांच्या पुरवठ्याचे काम Joyalukkas आणि Kalyan Jewellers यांना देण्यात आले आहे. जॉयअलुक्कासला 70 टक्के, तर कल्याण ज्वेलर्सला 30 टक्के काम मिळाले आहे. त्यानुसार जॉयअलुक्कास सुमारे 89,949, तर कल्याण ज्वेलर्स 38,550 अंगठ्या तयार करणार आहे.
TNMSC अर्थात तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने जून ते सप्टेंबरदरम्यान लाभार्थ्यांसाठी आवश्यक अंगठ्यांच्या पुरवठ्याचे वर्क ऑर्डर जारी केले आहेत.
केवळ एका पैशाची बोली चर्चेत –
या योजनेच्या निविदेवरून विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. 14 जुलै रोजी झालेल्या निविदा प्रक्रियेत 11 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. जॉयअलुक्कासने सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त प्रक्रिया शुल्क, विमा, वाहतूक आणि BIS हॉलमार्किंगसह इतर खर्चासाठी केवळ एक पैसा बोली लावली.
इतर कंपन्यांनी याच अतिरिक्त शुल्कासाठी 410.97 रुपयांपासून 15 हजार रुपयांपेक्षा अधिक बोली लावल्याचा दावा विरोधकांनी केला. त्यानंतर इतर निविदादारांना विजयी बोलीची माहिती देण्यात आल्यानंतर कल्याण ज्वेलर्सनेही त्याच दराची बोली लावली.
जॉयअलुक्कासने स्पष्टीकरण देताना म्हटले की, सुमारे 755 कोटी रुपयांच्या या खरेदीत सोन्याची किंमत हा मुख्य खर्च आहे आणि बाजारभावापेक्षा केवळ एक पैसा अधिक असा सांकेतिक सेवा शुल्काचा दर कंपनीने दिला आहे.
विरोधकांचा खरेदी प्रक्रियेवर सवाल –
DMK आणि AIADMKच्या सदस्यांनी निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. सोन्याच्या अंगठ्यांची खरेदी TNMSCमार्फत का करण्यात आली, असा सवालही विरोधकांनी केला. TNMSCची स्थापना औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य सुविधांसाठी करण्यात आली असताना सोन्याच्या अंगठ्यांची खरेदी त्यामार्फत का केली जात आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, आरोग्यमंत्री अरुणराज यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. सरकारी आरोग्य सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढवणे, सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बालकाचा जन्मदिवस संस्मरणीय करणे आणि मातृत्वाचा आनंद साजरा करणे, हा योजनेचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले.





