मंचर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे मनोमिलन होणार, या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात या चर्चेला जोर चढला असून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य एकत्रीकरणामुळे दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी आपले भवितव्य धोक्यात येईल, या भीतीने इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. तर काही जणांनी संभाव्य मनोमिलन टळावे, यासाठी देवाला साकडे घातल्याच्या चर्चाही रंगत आहेत.अजित पवार गटातील तसेच शरद पवार गटातील काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकत्र येण्यास तीव्र विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नेते एकत्र आले तर स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलतील, अनेकांचे महत्त्व कमी होईल आणि काहींचे राजकारणच संपुष्टात येईल, अशी भावना या वर्गात आहे. याच भीतीपोटी काहींनी पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात केली असून, इतर पक्षांचे दरवाजे ठोठावले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मनोमिलन होणार की नाही, याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट नसली तरी या चर्चेने ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.