तळेगाव स्टेशन – आठवडे बाजाराच्या दिवशी रविवारी जिजामाता चौक आणि मारुती मंदिर चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच नगरपरिषदेच्या या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. नगरपरिषद अतिक्रमण विरोधी पथक आणि वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे तळेगावच्या आठवडे बाजारात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
गर्दी तिथे बाजार, अशी स्थिती सध्या तळेगावमध्ये पहायला मिळत आहे. येथील जिजामाता चौक ते स्टेशन चौक रस्त्यावर दुतर्फा फळे, भाजीपाला विक्रेत्यांमुळे रोजच आठवडे बाजार भरत असल्यासारखी स्थिती आहे. जुन्या नगरपरिषद कार्यालयासमोर नव्याने भाजी मंडई निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रोजच भरणाऱ्या अशा बाजारामुळे रविवारी भरणाऱ्या पारंपरिक आठवडे बाजारात खरेदी- विक्रीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी मारुती मंदिर चौकातील फळे विक्रेत्यांना निबंध घालून नगरपरिषद कार्यालयासमोर हातगाड्या लावून विक्रीस मुभा देण्यात आली होती. महिनाभर जिजामाता चौक आणि मारुती मंदिर चौकामध्ये नियमांचे पालन करण्यात आले. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने सातत्य न ठेवल्याने काहीच आठवड्यांतच या योजनेचा फज्जा उडाला. फळे, भाजी विक्रेते पुन्हा दुतर्फा रस्त्यावर, भर चौकात हातगाड्या लावून विक्री करत आहेत.
परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप
जिजामाता चौक ते स्टेशन चौकाची चौपाटी झाली आहे. तळेगाव बाहेरून येणारे फळ-भाजीपाला विक्रेते रोज कचरा जागेवरच टाकून जातात. त्यामुळे येथे कचराकुंडीचे स्वरूप येते. त्यामुळे रहदारीस अडथळा येऊन वाहतूक कोंडी, अपघात आणि वादविवादाच्या प्रसंगात वाढ झाली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या फळ-भाजीपाला विक्रेत्यांना समज दिली होती. वाहतुकीची कोंडी टाळून, स्वच्छता राखून आठवडे बाजाराला सुटसुटीतपणा येण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– जयंत मदने, अतिक्रमण विभागप्रमुख, तळेगाव दाभाडे नगरपरिषद