तळेगाव दाभाडे – महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अनेक कामाच्या बाबतीत तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र महाविकास आघाडीतील मिञ पक्ष काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आरपीआय निकाळजे गट या पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे पार पडली.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, शादानभाभी चौधरी, जयश्री पवार, पुष्पा भोकसे, किसन कदम, राजेश वाघोले, सुनिल शिंदे, मदन शेडगे, शांताराम भोते, मिकी कोचर, बारकू ढोरे, पांडुरंग दाभाडे, रोहिदास वाळुंज, संभाजी राक्षे, गफूरभाई शेख, मधुकर कंद, नासिर शेख, मारुती आडकर, सहादू आरडे, रमेश घोजगे, नवनाथ केदारी, योगेश चोपडे, शंकर मोढवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे विविध प्रश्न, शेतकऱ्याची व्यथा, यावर एकत्रित आंदोलन उभारणे, महिलांचे प्रश्न सोडवणे, विविध शासकीय योजना, सुरू असलेल्या कामातील भ्रष्टाचार, प्रशासनातील अरेरावीपणा अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच २७ ते ३० डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांना सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, दिलीप ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, काँग्रेस मा. तालुकाध्यक्ष गणेश काजळे, मा. नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत यांनी केले. प्रास्ताविक मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी केले. स्वागत काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले. आभार राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी मानले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.