Takrarwadi Phata Toll Protest – पुणे – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील तक्रारवाडी फाटा बेलसर टोलप्लाझावर शुक्रवारी (दि. २४ ) सकाळी वाहनचालकांकडून टोलवसुली करण्यास ठेकेदार कंपनीने सुरुवात करताच पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी व विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टोलप्लाझावर राडा केला.यावेळी प्रचंड घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांच्या आंदोलनानंतर साधकबाधक चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात बैठक घेणार असून तोपर्यंत स्थानिकांकडून टोलवसुली नाही, असे आश्वासन व्यवस्थापकांनी दिले. टोलप्लाझावर जेजुरी, साकुर्डे, बेलसर, तक्रारवाडी, शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, वागदरवादी, वाल्हे, दौंडज, अडाचीवाडी, मावडी आदी गावांतील लोकप्रतिनिधी व विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धाव घेत आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गावर टोलप्लाझा निर्माण केला असून टोलप्लाझापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील स्थानिक भूमिपुत्रांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी काही महिन्यांपासून मनसे, संभाजी ब्रिगेड, दादा फाऊंडेशन, राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, स्थानिकांना ३५० रुपयांचे मासिक पासाचे आमिष दाखवत एमऐपी इंटरप्रायझेस कंपनीच्या ठेकेदारीतून टोलवसुलीस शुक्रवारी (दि.२४) प्रारंभ होताच मनसे तालुकाप्रमुख उमेश जगताप, टोल नाका. जेजुरी शहराध्यक्ष गणेश कुंभार, संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप, विक्रम फाळके, दादा फाऊंडेशनचे अध्यक्ष यशवंत दोडके, कार्यवाह शिवराज झगडे, हेमंत माने, प्रथमेश सकट, पुरंदरचे माजी उपसभापती निलेश जगताप, साकुर्डे सरपंच राजेंद्र जाधव, अजित सस्ते, बाळासाहेब काळे, पोपट जगताप, वामन सस्ते, मारुती सस्ते, बेलसरचे उपसरपंच धीरज जगताप, शिवरीचे राजेश क्षीरसागर, खळदचे योगेश कामथे, शिवसेनेचे दादा थोपटे, महेश स्वामी, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, माजी नगरसेवक दादा उबाळे, जेजुरी नगरसेवक योगेश जगताप आदींसह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर धाव घेत आंदोलनाला सुरुवात केली. टोलप्लाझापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील स्थानिक नागरिकांना पूर्णतः टोलमाफी मिळावी या भूमिकेवर आंदोलक ठाम असून पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलनांची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी जेजुरीत बैठक होणार टोलवसुली करणाऱ्या कंपनीचे गणेश पाटील, व्यवस्थापक नितीन वाकले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. आंदोलकांनी भूमिका मांडली. मंगळवारी (दि.२८) लोकप्रतिनिधी- आंदोलकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर जेजुरी येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करून यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत २० किलोमीटर परिसरातील स्थानिक नागरिकांकडून टोलवसुली करण्यात येणार नाही. केवळ आधारकार्ड पाहून वाहने सोडली जातील. स्थानिकांनी व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक नितीन वाकले यांनी केले आहे.