जामखेड : शहरातील महाविद्यालय व शाळा सुटल्यानंतर रोडरोमिओंचा उद्रेक वाढला असुन चौकाचौकात त्यांनी ठाण मांडले आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असुन शहरातील महिला मुलींना होणाऱ्या छेडछाडी व त्रासाबाबत जामखेड पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत आंदोलन करण्याचा इशारा पांडुरंग भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील शाळा व कॉलेज सुटण्याच्या वेळेत विद्यार्थीनींना वारंवार त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील महाविद्यालय, शाळा परिसर तसेच चौक, तहसील कार्यालय परिसर, बसस्थानक इत्यादी ठिकाणी काही टवाळखोर युवक मोटारसायकल वेगात चालवणे, मुलींना कट मारणे, हार्न वाजवणे, हातवारे करणे, अश्लील टोमणे मारणे अशा प्रकारे मुलींची छेड काढत आहेत. अलीकडेच जामखेड बसस्थानक येथे मुलींना छेडछाडीचा प्रकार घडला असून अशा प्रकारांमुळे कायद्याची भीती न बाळगता काही युवक बिनधास्तपणे फिरताना दिसतात. या घटनांमुळे विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी सुमारे ७ वाजेपासून कॉलेज सुरू होत असल्याने त्या वेळेस नागरिकांची वर्दळ कमी असते व काही युवक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे अशा प्रकारांवर तात्काळ प्रतिबंध होणे अत्यावश्यक आहे. काय आहेत मागण्या शाळा/महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस विशेष पोलिस पथक नियुक्त करावे. बसस्थानक, चौक, कार्यालय परिसर, कॉलेज रोड इत्यादी प्रमुख ठिकाणी गस्त वाढवावी. अशा टवाळखोर युवकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. गरज भासल्यास विशेष मोहिम पथक चालु करणे गरजेच आहे. वरीलप्रमाणे योग्य ती व तात्काळ कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती. अन्यथा भविष्यात कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग मधुकर भोसले यांनी दिला आहे. जामखेड शहरात व तालुक्यात रोडरोमिओंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वीच जामखेड बस स्थानकावर एका रोडरोमिओने मुलीची दिवसाढवळ्या छेड काढली होती. मात्र त्या मुलीने प्रतिकार केला व त्या रोडरोमिओला पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले होते. दैनिक प्रभातने वेळोवेळी जामखेड मधील रोडरोमिओ बद्दल आवाज उठवला होता.