नवी दिल्ली – कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळवरून अद्यापही सुरूच असून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून या विधेयकांचा जोरदार विरोध केला जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार अपयश ठरले असून हे अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली असं त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले,’कोणत्याच देशाने त्याचे कामकाज बंद ठेवले नव्हते. रशियात बंद होते. तेथे हुकमाशाहीच आहे. मात्र, भारतात ते बंद ठेवले. कारण संसदेत त्या अपयशाची चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लावला.
दरम्यान, कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.