बीजिंग, तैपेई – भारतीय मजूरांची कुचेष्ठा केल्याबद्दल तैवानमधील कामगार मंभी सू मिंग-चून यांनी भारतीयांची माफी मागितली आहे. भारतातील एका विशिष्ठ भागातील शरणार्थी कामगारांना नियुक्त करण्याच्या सरकारी योजनेबद्दल सू यांनी ही टिप्पणी केली होती.
दोन्ही देशांमधील जनतेतील थेट संवाद वाढवण्याबाबत १६ फेब्रुवारीला सामंजस्य करार झाल्यामुळे तैवानमध्ये भारतीय मजूरांना भरती केले जाणार आहे. या संदर्भात टिव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना सू यांनी सर्वात प्रथम इशान्य भारतातील मजूरांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले.
इशान्य भारतातील नागरिकांचा वर्ण आणि खाद्य संस्कृती तैवानशी मिळती जुळती आहे. तसेच या भागातील लोक प्रामुख्याने ख्रिश्चन असल्याने त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
मात्र त्यांच्या या टिप्पणीवर सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमधूनच जोरदार टीका झाली. हे वक्तव्य वंशभेद करणारे असल्यामुळे या धोरणाला आपला विरोध असल्याचे संसद सदस्य चेन कुं- तिंग यांनी म्हटले होते. त्यानंतर सू यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.