मुंबई -आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या भारतीय संघात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज अक्सर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा नव्याने समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.
यंदाच्या मोसमात शार्दुलने सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीचे लक्ष्य वेधून घेतले. तसेच अक्सर पटेलने फारशी सरस कामगिरी केलेली नसून त्याला आयपीएल स्पर्धेतही अपयशाचाच फटका बसला आहे.
बीसीसीआयने आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के. गौथम या खेळाडूंनाही अमिरातीतच थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. हे खेळाडू आता विश्वकरंडक स्पर्धेसाठी अमिरातीतच राहणार असून आयपीएल संपल्यावर ते भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश करणार आहेत.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी. स्टॅंडबाय खेळाडू – श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्सर पटेल.